Type Here to Get Search Results !

महाराष्ट्राचा ५५ वा वार्षिक निरंकारी सन्त समागम (व्हर्च्युअल) ११, १२ व १३ फेब्रुवारीला ; समागमाची जय्यत पूर्वतयारी


 

भक्ती, प्रेम व अलौकिक आनंदाचा अद्भुत संगम


मुंबई, ७ नोव्हेंबर, २०२२: निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात महाराष्ट्राचा ५५वा वार्षिक निरंकारी संत समागम दिनांक ११, १२ व १३ फेब्रुवारी, २०२२ रोजी व्हर्च्युअल रुपात आयोजित करण्यात आला आहे. या संत समागमाचा भरपूर आनंद जगभरातील समस्त भाविक भक्तगण आपापल्या घरातूनच ऑनलाईनच्या माध्यमातून घेऊ शकतील.

दरवर्षी नववर्षाचे आगमन होताच संपूर्ण महाराष्ट्रासह जगभरातील समस्त भाविक-भक्तगणांना भक्ती, प्रेम व आनंद यांच्या अद्भुत संगमाची अलौकिक अनुभूती प्रदान करणाऱ्या या संत समागमाची प्रतिक्षा असते ज्यामध्ये विविध संस्कृति, सभ्यतांचे अनोखे मिलन पहायला मिळते. हा संत समागम आपल्या विविधरंगी छटांमधून अनेकतेत एकतेचे चित्र प्रस्तुत करत विश्वबंधुत्वाची संकल्पना साकार करताना दिसतो.

मागील वर्षी महाराष्ट्र समागमाचे चित्रण अगोदर करण्यात आले होते व त्यानंतर ते व्हर्च्युअल रुपात प्रसारित करण्यात आले. मात्र, यावर्षी या समागमाचे थेट प्रक्षेपण (Live Telecast) मिशनच्या वेबसाईटवर सायंकाळी ५.०० ते रात्री ९.३० आणि साधना टी.व्ही.चॅनलवर सायंकाळी ६.०० ते रात्री ९.३० या वेळात करण्यात येणार आहे. उल्लेखनीय आहे, की इतिहासामध्ये प्रथमत:च महाराष्ट्राच्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. समागमाचे थेट प्रक्षेपण होणार असल्याच्या बातमीने समस्त निरंकारी जगतामध्ये हर्षोल्लासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याशिवाय समागमाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी १२.०० ते २.०० या वेळात होणाऱ्या सेवादल रॅलीचेही थेट प्रक्षेपण मिशनची वेबसाईट आणि साधना टी.व्ही.चॅनलवर प्रसारित केले जाणार आहे.

समागमाचा मुख्य विषय:
यावर्षीचा संत समागम ‘विश्वास, भक्ती, आनंद’ या विषयावर आधारित आहे. भक्तीचा मतितार्थ असा आहे, की जेव्हा आपण या निराकार प्रभुला  जाणून त्याला आपल्या जीवनाचा आधार बनवतो आणि त्याच्याशी एकरूप होऊन जातो तेव्हा खऱ्या अर्थाने जीवन भक्तीमय होते. त्यानंतर विश्वास हा भक्तीला आणखी सदृढता प्रदान करतो आणि परिणामस्वरूप जीवनात अशी अवस्था निर्माण होते ज्यायोगे आनंद व सुखाची अनुभूती स्वयमेव होऊ लागते. मग सर्वांभूती या एका प्रभुचे दर्शन होत राहते आणि सर्वांसाठी हृदयामध्ये केवळ कल्याणाची भावना उत्पन्न होते. यावरुन हे स्पष्टपणे म्हणता येईल, की ‘विश्वास, भक्ती, आनंद’ ही त्रिसूत्री भक्तीची अशी परिमाणे आहेत ज्यांचा अंगिकार करुन  मनुष्य स्वत:चे कल्याण साधत असतानाच इतरांसाठीही प्रेरणास्रोत बनून राहतो. खरं तर समागमाचा हाच उद्देश आहे.
वैश्विक महामारी कोविड-१९ चा प्रभाव अद्याप पूर्णपणे नाहीसा झालेला नाही. ही बाब ध्यानात घेऊन संत समागमाची पूर्वतयारी पूर्ण समर्पण भावनेने व जागरुकपणे सरकारकडून जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करत केली जात आहे. समागमाच्या आयोजनात भाग घेणाऱ्या सेवादारांकडून थर्मल स्क्रीनिंग, मास्क, सॅनिटायझेशन व सामाजिक अंतर याबाबतच्या नियमांचे यथायोग्य पालन केले जात आहे. याशिवाय समागमाच्या कार्यक्रमात भाग घेणाऱ्यांची कोविड (RT-PCR, Rapid Antigen Test) चाचणीदेखील केली जात आहे. त्यांच्यासाठी कोविड-१९ च्या दोन लसी घेतलेल्या असणे अनिवार्य करण्यात आले आहे. 

समागमाचा कार्यक्रम
समागमाचा प्रारंभ शुक्रवार, दि.११ फेब्रुवारी, २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजता होणार असून त्यामध्ये सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज ‘मानवतेच्या नावे संदेश’ (Message to Mankind) प्रदान करतील. सत्संग कार्यक्रम रात्री ९.०० वाजेपर्यंत चालत राहील व त्यानंतर ९.०० ते ९.३० दरम्यान सद्गुरु माताजी आपल्या पावन प्रवचनाद्वारे आपले आशीर्वाद प्रदान करतील.
समागमाच्या दुसऱ्या दिवशी शनिवार दि.१२ फेब्रुवारी, २०२२ रोजी दुपारी १२.०० ते २.०० या वेळात एक रोमहर्षक सेवादल रॅली संपन्न होईल. रॅलीची सांगता सद्गुरु माताजींच्या पावन आशीर्वचनांद्वारे होईल. त्यानंतर सायंकाळी ५.०० वाजता सत्संगाचा कार्यक्रम सुरु होईल ज्याचे समापन रात्री ९.०० ते ९.३० दरम्यान सद्गुरु माताजींच्या प्रवचनाद्वारे होईल.
समागमाच्या तिसऱ्या दिवशी, रविवार दि.१३ फेब्रुवारी, २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजता सत्संगाचा कार्यक्रम सुरु होईल ज्यामध्ये एक ‘बहुभाषी कवी संमेलन’ आयोजित केले जाईल. या कवी संमेलनाचा विषय आहे – ‘श्रद्धा भक्ती विश्वास असावा, मनामध्ये आनंद वसावा’. या विषयावर महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील कवी सज्जन आपापल्या कविता सादर करतील. शेवटी, सद्गुरु माताजींच्या दिव्य प्रवचनाद्वारे समागमाची सांगता होईल.


समागम स्मरणिका : प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संत समागमाच्या निमित्ताने ‘विश्वास, भक्ती, आनंद’ या विषयावर एक विशेष स्मरणिका प्रकाशित करण्यात येत असून त्यामध्ये हिंदी, इंग्रजी, पंजाबी, मराठी, गुजराती तसेच नेपाळी भाषांतून अनुभवी संतांचे सारगर्भित लेख वाचायला मिळतील. हे लेख भक्तगणांना आपली भक्ती सदृढ करण्यासाठी आणि नवीन जिज्ञासूंना सन्मार्गाकडे वळण्याकरिता प्रेरणादायी ठरतील.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.